अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना अर्थसहाय्याच्या विविध योजना


ग्राम विकास विभाग राज्यातील जिल्हा परिषदेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना त्यांना दारिद्र्यरेषेपासून वर आणण्यास सहाय्यभूत ठरतील, अशा अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास होऊ शकतो. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत ही योजना पोहोचवून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा यासाठी ही माहिती...

रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्र्यरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजना सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा वाटप, पीक संरक्षण शेतीची सुधारित औजारे, बैलगाडी, बैलजोडी, रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसंच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार सिंचन, ठिबक सिंचन संच, ताडपत्री या बाबींवर लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन वाढीस मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

लाभार्थ्यांसाठी निकष

• ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या स्वत:च्या नावे 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असेल असे शेतकरी लाभार्थी निवडीस पात्र असतील.
• त्यासाठी शेतजमीन धारणेचा अद्ययावत 7/12 उतारा व 8 अ चा उतारा अर्जासोबत सादर करणे संबंधितास बंधनकारक आहे.
• लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रगतशील शेतकरी असणे बंधनकारक आहे.
• त्याचप्रमाणे तो दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये (बी.पी.एल.) असावा.
• अशा लाभधारकासाठी शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा दाखला वैध धरण्यात येईल.

दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये लाभार्थ्यांचा समावेश नसेल तर ज्या शेतकऱ्यांची जमीन धारणा 6 हेक्टरपेक्षा कमी आहे आणि ज्याचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न 50 हजाराच्या मर्यादित आहे. असे शेतकरीही लाभासाठी पात्र असतील. मात्र त्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेऊन तो अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

अनुदानाचे स्वरुप

या योजनेतील निवड केलेल्या लाभार्थींना अनुज्ञेय अनुदानाची रक्कम रोख स्वरुपात देय नसून योजनेतील मंजूर घटकाद्वारे द्यावयाची आहे. नवीन विहिरी, जुनी विहीर दुरूस्ती, बैलगाडी, रेडेजोडी या बाबींसाठी अनुदानाची रक्कम काटेकोरपणे पडताळणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेत एकूण चौदा बाबींवर अर्थसहाय्य देण्यात येते. लाभार्थ्यांची मागणी त्याच्याकडून लेखी घेऊन त्याचप्रमाणे लाभ देण्यात येतो.

बाबनिहाय अनुदान मर्यादा
  • जमीन सुधारणा (1 हेक्टर मर्यादेत) मृद संधारण निकषानुसार एक हेक्टर क्षेत्रासाठी 40 हजार रुपये.
  • प्रात्यक्षिकासाठी निविष्ठ वाटप (1 हेक्टर मर्यादेत) 5 हजार रुपये.
  • पीक संरक्षण, शेतीची सुधारित अवजारे यासाठी 10 हजार रुपये.
  • बैलजोडी, रेडेजोडीसाठी 30 हजार रुपये.
  • बैलगाडीसाठी 15 हजार रुपये.
  • जुन्या विहिरीच्या दुरूस्तीसाठी 30 हजार रुपये.
  • इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये.
  • पाईप लाईनसाठी नाबार्डच्या निकषानुसार 20 हजाराच्या मर्यादेत असेल तर पंपसंचासाठी 20 हजार रुपये. नवीन विहिरीसाठी 70 हजार ते एक लाख रुपयाच्या मर्यादेत (रोहयो अंतर्गत योजनेनूसार).
  • शेततळ्यांसाठी 35 हजार मृद संधारण निकषानुसार.
  • परसबाग कार्यक्रमासाठी 200 रुपये प्रति लाभार्थी (फलोत्पादन विभागाच्या निकषानुसार).
  • तुषार सिंचन, ठिबक सिंचन संच पुरवठ्यासाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टर (फलोत्पादन विभागाच्या निकषानुसार).
  • ताडपत्रीसाठी 10 हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान अनुज्ञेय आहे.

जे लाभार्थी नवीन विहीर घटकाचा लाभ घेतील त्यांच्यासाठी प्रति लाभार्थी उच्चत्तम मर्यादा 70 हजार रुपये अनुज्ञेय राहिल.

अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) व पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पण्या