डॉ.आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचे नियोजन - राजकुमार बडोले

अलिबाग : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यात सामाजिक चळवळी केलेल्या आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचे राज्याचे नियोजन आहे. त्यानुसार महाड येथील चवदार तळे याचे सुशोभीकरण करावे तसेच येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विकास करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे "समता व सामाजिक न्याय वर्ष" म्हणून साजरे करण्यात येत आहे. या अनुषंगाने 26 जानेवारी ते 14 एप्रिल 2016 पर्यंत समता चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता चित्ररथाचा रायगड जिल्ह्यातील शुभारंभ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत महाड येथील चवदार तळे येथे झाला. त्यानंतर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.बडोले बोलत होते. याप्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार भाई गिरकर, महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविसकर आदी उपस्थित होते.

श्री.बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षात राज्यभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळी केलेल्या केलेल्या स्थळांचा विकास करुन त्याठिकाणी सामाजिक पर्यटनाला चालना मिळावी यादृष्टीने कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. महाडचे चवदार तळे याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी केलेला सत्याग्रह ही ऐतिहासिक घटना व ऐतिहासिक स्थळ आहे. हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसीत होण्यासाठी चवदार तळ्याचे सुशोभीकरण करावे, पाण्याचे शुध्दीकरण करावे, राष्ट्रीय स्मारकाचाही यथोचित विकासीत करण्याच्या दृष्टीने स्थानिक यंत्रणेने कार्यवाही करावी.

आमदार भाई गिरकर म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत सामाजिक चळवळीत भाग घेतलेल्या स्थानिक व्यक्तींच्या घराचा शोध घेऊन त्याची नोंद ठेवावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी निगडीत स्थळांचा विकास करुन तेथे निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, सामाजिक पर्यटन याचा विकास होईल यादृष्टीने पर्यटन विभागानेही नियोजन करुन काम करावे.

राष्ट्रीय स्मारकाचा विकास होण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांची मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करावी अशी सूचना आमदार भरतशेठ गोगावाले यांनी यावेळी केली.

समता रथाचे उद्दिष्ट

समता रथाचा मूळ उद्देश म्हणजे पथनाट्य, लोकसंगीत, गायन, वाचन, जलसा यांचा उपयोग करुन समाजातील विषमता दूर करुन सामाजिक समता व सलोखा समाजामध्ये अधिकाधिक दृढ व्हावा, असा आहे. तसेच सध्याच्या काळामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शी विचारांची तरुणांमध्ये रुजवण होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचा उपयोग व्हावा असा आहे. समतारथाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत करण्यात आले असून चित्ररथाचे जिल्ह्यातील नियोजन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांच्याकडून करण्यात येत आहे.

समता चित्ररथाचा रायगड जिल्ह्यातील कार्यक्रम

महाड 18 व 19 फेब्रुवारी 2016, दासगांव 20 फेब्रुवारी 2016, लोणेरे 21 फेब्रुवारी 2016, गोरेगांव 22 फेब्रुवारी 2016, कालवण ता.माणगांव 23 फेब्रुवारी, माणगांव 24 फेब्रुवारी, तळा 25 व 26 फेब्रुवारी, अष्टमी रोहा 27 फेब्रुवारी, अलिबाग 28 फेब्रुवारी, जिल्हा मुख्यालय. चरी ता.अलिबाग 29 फेब्रुवारी, पेझारी ता.अलिबाग 1 मार्च, पेण 2 व 3 मार्च , पनवेल, 4 व 5 मार्च 2016

टिप्पण्या