‘सुधीर’ ची उत्तुंग भरारी !






जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी ते बेस्ट सेलर पुस्तकाचा लेखक

सध्या मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात ‘कोरोना’ विषाणूने हाहा:कार माजला आहे. विषाणूमुळे निर्माण झालेल्या ‘लॉकडाऊन’ पर्वात मुंबई येथील वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी लिखित ‘चेकमेट : हाऊ द बीजेपी वन ॲण्ड लॉस्ट महाराष्ट्र’ (CHECKMATE: HOW THE BJP WON AND LOST MAHARASHTRA) पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘पेग्विन’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होत आहे. समीक्षक, लेखक, पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या तोडून या पुस्तकाचीच चर्चा होत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या अर्भुतपूर्व सत्तांतर नाटयामागील अनेक गुपीतांचा गौप्य स्फोट सुधीरने या पुस्तकात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक आज ‘ॲमेझान बुक पोर्टलवर’ बेस्ट सेलर म्हणून झळकत आहे.
        तुम्ही म्हणालं, यात काय विशेष राजकीय पत्रकार म्हटलं की तो पुस्तक लिहिणार त्यात काय अप्रुप आहे. अप्रुप या गोष्टीचे आहे. रत्नाप्रिंपी (ता.पारोळा, जि.जळगांव) या लहानशा खेडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी माध्यमात शिकलेला तरूण पुणे मार्ग मुंबईच्या पत्रकारितेत स्थिरावतो व नाव कमवितो. अमळनेरच्या प्रताप कॉलेजमध्ये सुधीरने बी.ए.(इंग्रजी) विषयात केल्यावर पुणे येथे वाडिया कॉलेजमध्ये एम.ए (इंग्रजी) चे शिक्षण घेतले. डी.एड.चे शिक्षण घेतले असल्यामुळे दरम्यानच्या काळात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी ही सुधीरला चालून आली होती. मात्र पत्रकार म्हणून स्वतंत्रपणे काम करण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे सन 2003 मध्ये पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ‘जनसंज्ञापन व पत्रकारिता’ या अभ्यासक्रमांच्या पद्व्युत्तर पदवीत सुधीर ने प्रवेश घेतला. सन 2003 च्या या बॅचमध्ये मलाही प्रवेश मिळाला होता. तत्पूर्वी मी कधीही कॉलेजचे तोंड (बारावीचे वर्ष वगळता) पाहिले नव्हते.  अशा खेळवट वातावरणातून मी आलो असल्यामुळे पहिला महिना रानडे इन्स्टिट्यूट मधील वातावरण मानवले नाही. उच्चभ्रु समाजातील प्रमाणभाषेचा व भाषेच्या शुध्दतेचा कमालीचा आग्रह असलेल्या सहकारी मित्रांशी व प्राध्यापक वर्गांशी मी समरस होत नव्हतो. असातच मग मी पहिल्या महिन्यातच घरी परतण्याची तयारी केली होती. या द्विविधा अवस्थेत आमचे विभागप्रमुख डॉ.किरण ठाकूर व मित्र संजय पाटील यांनी धीर देऊन थांबवून घेतले. पहिल्या महिन्यातच सुधीरशी परिचय झाला. सुधीर ‘खान्देश’ मधून आला असल्यामुळे अधिक जिव्हाळा व आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आत्मीक बळ मिळाले. त्यानंतर सुधीर व मी पुणे विद्यापीठातील वसतिगृहात एकत्र राहू लागलो. मला 7 नंबर वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. तर सुधीरला 3 नंबर वसतिगृहात प्रवेश‍ मिळाला होता. मात्र चहा, नास्ता, जेवणच्या निमित्ताने एकत्र भेटी व चर्चा होत असत. वसतिगृहात खान्देशमधून आलेल्या आमच्या मित्रांचा ग्रुप तयार झाला होता. या दोन वर्षात अनेक धमाल व मस्ती आम्ही केली. भोजनालयातील निकृष्ट जेवणाविरूध्द सुधीरने आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळे सुधीर मधील बंडखोर गुण दिसून आला. सुधीरने जरी इंग्रजी विषयात एम.ए केले असले तरी त्याचे इंग्रजीवर पाहिजे तेवढे प्रभुत्व नाही. असे आमच्या संस्थेतील एका ‘व्हिजिंटींग फॅक्लटी ’ मधील प्राध्यापकाचे मत होते.  त्या प्राध्यापकाने तर सुधीरला प्रोजेक्ट इंग्रजीमध्ये न लिहता मराठीतच लिहित जा ! असा सल्ला दिला होता. सुधीरने मात्र पत्रकारिता इंग्रजीमध्येच करण्याची खूणगाठ मनाशी पक्की केली असल्यामुळे त्याने इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी पुन:श्च इंग्रजी ABCD पासून अभ्यासाला सुरूवात केली. व्याकरणाची काही पुस्तके तो बेसिक पासून अभ्यास करू लागला. याचा साक्षीदार मी होतो. दिवसातील चहा, नास्ता व भोजन वेळ सोडली तर सर्व वेळ त्यांने प्रचंड अभ्यास व मनन केले. पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांने इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले होते. त्यानंतर 2005 पासून सुधीरने मागे वळून पाहिले नाही. मुंबई येथील ‘फ्री प्रेस जर्नल’ या वृत्तपत्रात पत्रकारितेची संधी मिळाल्यावर त्याचा पत्रकारितेचा आलेख चढता राहिला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘डीएनए’ नंतर सध्या‘ द न्यू इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकात सहाय्यक संपादक म्हणून सुधीर काम करत आहे. गेल्या 15 वर्षात ‘सुधीर’ ने केलेल्या वार्तांकनाने प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेला जोरदार हादरे दिले आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने स्थापित केलेल्या ‘कट्टा न्यूज’ या ट्विटर हँडलवरील स्कूप ने प्रस्थापित दैनिकातील संपादक व पत्रकारांना त्याची दखल घेणे भाग पाडले. ‘अजित पवार 35 आमदारांसह भाजपवाशी होणार आहेत.’ ही बातमी त्याने देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी च्या दोन दिवस आधी ‘कट्टा न्यूज’ वर फ्लॅश केली  होती.
        रत्नाप्रिंपीतील छोट्याशा खेड्यातील अशिक्षित शेतकरी, कष्टकरी आई-वडिलांच्या या सुपुत्राचे ‘पेंग्विन’ सारखी नावाजलेली प्रकाशन संस्था पुस्तक प्रकाशित करते.  ही अभिमानाची गोष्ट आहे. एक सर्वसामान्य तरूण आज राजकीय पत्रकारितेत आपले खरोखरचे नेटवर्क तयार करतो. जे विश्वसनीय असतं, असत्य नसते, खोटं नसतं, फेक नसतं, दिशाभूल करणारे तर मुळीच नसते. या खास नेटवर्कच्या बळावर सुधीरने अनेक राजकीय बातम्या ब्रेक केल्या. सुधीरने ब्रेक केलेल्या बातम्यांच्या मागे अनेक वृत्तसंस्थाच्या पत्रकारांना फरफटत जाणे भाग होते.
राजकीय बातमीदारी करतांना सुधीरवर 2017 मध्ये प्राणघातक हल्ला ही झाला. यातून तो सुखरूप बाहेब आला. आणि आज तो नव्या जोमाने पत्रकारिता करत आहे. अशा या माझ्या मित्राला त्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा !
@सुरेश पाटील, नाशिक

टिप्पण्या