सामाजिक स्थित्यरांचा वेध !
आजच्या ‘महाराष्ट्र टाईम्स ’च्या नाशिक आवृत्तीत
मी वाचलेल्या ‘आयदान’ या आत्मचरित्राविषयी छापून आले आहे. मी लिहलेले मूळ पुस्तक
परिचय या ठिकाणी वाचकांसाठी जसाच तसा देत आहे.
---------------------------------------------------------------
उर्मिला पवार यांचे ‘आयदान’ हे आत्मचरित्र वाचले. ‘आयदान’ हे एका दलित स्त्री लेखिकेने लिहलेले
आत्मचरित्र आहे. यापूर्वी दलित लेखकांची ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘बलुतं’ ही आत्मचरित्र
बालपणीच वाचले आहेत. मात्र अलीकडच्या काळात पूर्णपणे कोठेही खंड न पडू देता ‘आयदान’
ही मी वाचलेले पहिले आत्मचरित्र.
पुण्याच्या ग्रंथाली प्रकाशनाने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे.
प्लॅस्टिकचं युग येण्यापूर्वी बांबूपासून तयार केलेली सुपं, रोवळ्या, परड्या,
हारे, करंडे इत्यादी वस्तूंना महत्त्व होतं. या सगळ्या वस्तूंना ‘आयदान’ किंवा
आवतं म्हणतात. कोकणाबाहेर बुरूड नावाच्या भटक्या विमुक्त जातींचा पोट भरण्याचा
हा व्यवसाय आहे. कोकणात हा व्यवसाय अनुसूचित जातींच्या यादीत असलेल्या महार या
जातीकडे होता. बांबूच्या टोपल्या, सुपं व इतर वस्तू
विणणे म्हणजे ‘आयदान’. “आईचे
हे विणणे व माझे लेखन यात दु:खाचा समान धागा आहे. म्हणून या आत्मचरित्राला ‘आयदान’ हे नाव दिले
आहे.”
असे लेखिकेने प्रस्तावनात नमूद केले आहे.
प्राजंळ, निखळ व सहज शैलीत उर्मिला पवार यांनी हे आत्मचरित्र लिहिलेले
आहे, स्वत:ची वैगुण्येही सांगितलेली आहेत. जात आणि दारिद्र्य याचे चटके त्यांना
सोसावे लागले, तसेच स्त्री असल्यामुळे घरात समान हक्कासाठी संघर्ष करावा लागला.
कुठलेही अनुभव लेखिका अगदी आत्मीयतेने
रंगवते. जीवन जसे समोर आले तसे लेखिका त्याला भिडत गेली त्यामुळेच हे आत्मचरित्र
विचारप्रवृत्त करते. लहान शाळेतून लेखिका जसजशी मोठ्या शाळेत जाऊ लागली, तसतसे
तिचे अनुभवविश्व विस्तारू लागले. त्यांच्याकडची लग्नं, वराती, जेवण… सगळं त्या
यात सविस्तर लिहितात. उर्मिला यांच्या घरी दारिद्र्य, परंतु वडिलांनी शिक्षणाचे महत्व
ओळखले होते. मुलांच्या शिक्षणासाठी ते रत्नागिरीत येऊन राहिले. शाळेत आणि इतर
ठिकाणी उर्मिलांना अस्पृश्यतेचा त्रास सहन करावा लागला. त्यांची आई त्यांना तयार झालेल्या
वस्तू पोचवण्यासाठी ग्राहकांच्या घरी पाठवायची तर त्यांना बाहेरच उभे करून ठेवले
जायचे. त्यांनी दिलेली वस्तू पाणी टाकून शुध्द करुन मग घेतली जायची. त्यांच्या
हातावर पैसेही दुरून टाकले जायचे. शाळेत एकदा काही मुलींनी जेवणाची पंगत करण्याचा
बेत केला. कोणी तांदूळ, कोणी डाळ आणायचे ठरले, पण उर्मिलांना मात्र
त्यांनी सांगितले, तू आपले पैसेच घेऊन ये ! स्वयंपाक करतानाही त्यांना दूरच
ठेवण्यात आले, कशाला हात लावू दिला नाही.
उर्मिला लहान असताना त्यांच्या घरातील दोन
खोल्या त्यांच्या आईने भाड्याने दिल्या होत्या. पण लेखिकेची जात कळली की भाडेकरू घर सोडून जात. एकदा तर मुसलमान भाडेकरूलाही त्याच्या
नातेवाईकाने घर सोडायला भाग पाडले. जातीव्यवस्थेचे हे प्रत्ययकारी अनुभव
लेखिकेने आत्मचरित्रात लिहिले आहेत.
उर्मिला पवार ह्या
मॅट्रिकला असतानाच त्यांचे हरिश्चंद्रवर प्रेम जडले, त्यांनीच पुढाकार घेऊन
आडवळणाने ते व्यक्त केले. त्यांचे लग्नही जमले व त्या मुंबईला आल्या. लग्नानंतर
त्या बी.ए. झाल्या. तोपर्यंत पतीचा पाठिंबा होता. पण एम.ए. करायचे म्हटल्यावर
आपल्या पुढे जाणार म्हणून कुरकुर. पण त्या एम.ए झाल्या. चळवळीतील कार्यकर्त्या
हिरा बनसोडे यांच्याबरोबर कार्य करायला लागल्या. त्या आधीपासून सभाधीट होत्या.
लेखनही सुरू झाले होते. त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रणे यायला लागली, त्यांचे
नाव झाले तेव्हा पतीला अभिमान वाटायचा आणि त्याचबरोबर मत्सर आणि भीतीही. उर्मिला-हरिश्चंद्र या
जोडप्याला दोन मुली व एक मुलगा. हा मुलगा मेडिकलला शिकत असताना, ऐन तारुण्यात
त्याचा अपघातात मृत्यू झाला. हा या पती - पत्नीवर फार मोठा आघात होता. या आघातातून
सावरत त्यांनी आपला लेखन प्रपंच पुढे चालूच ठेवला
त्यामुळे त्यांना या दु:खावर मात करता आली.
दलित समाजातील उच्चभ्रूंच्या दांभिकपणाबद्दलही त्यांनी
लिहिले आहे. हे उच्चभ्रू आपण दलित आहोत हे उघड होणार नाही याची दक्षता घेत.
त्याकरता घरातील बुध्द, आंबेडकर यांच्या प्रतिमा सहज नजरेला पडणार नाहीत अशा जागी
ठेवत. एकदा उर्मिला व हिरा बनसोडे “दलित चळवळीत सहभागी व्हा ! ” सांगायला कॉलनीतील एका उच्चभ्रू दलित महिलेकडे
गेल्या तर तिचा पहिला प्रश्न, तुम्हाला कसे कळले आम्ही दलित आहोत, आम्हाला तर सगळे
कोब्राच समजतात! इतकेच नाही तर तिने शहाजोगपणे या दोघींनाचा बोधामृत दिले,
प्रत्येक व्यक्तीने स्वत:चा विकास करावा, त्यातूनच समाजाचा विकास होईल व त्यातून
देशाचा विकास होईल. यांनी एकच समर्पक उत्तर दिले, जर डॉ. आंबेडकरांनीही
असाच विचार केला असता तर आज तुम्ही कुठे असता? असे
अनेक प्रसंग लिखिकेने या आत्मचरित्रात नमूद केले आहेत.
उच्च
शिक्षण घेऊन उर्मिला पवार या एक संवेदनशील व्यक्ती म्हणून घडलं गेल्या. त्यांचा वाचन, लेखन, अभ्यास वाढला. दलितमुक्ती
चळवळ, स्त्रीउवाच या संघटनेत त्यांचा सहभाग वाढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची
जयंती, वगैरे निमित्ताने त्यांची भाषणं होऊ लागली. त्यात येणारे भलेबुरे अनुभव
त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहेत. त्यामुळे एक सामाजिक दस्तावेज म्हणूनदेखील या
पुस्तकाचे महत्त्व आहे. मूळचा उदार, उमदा असलेला त्यांचा
पतीही शेवटी या पुरुषप्रधान समाजाचाच भाग होता. कधी कधी त्याचे चटकेही उर्मिला
पवार यांना सोसावे लागले. त्याविषयीही यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे. दलित स्त्रीयांच्या सामाजिक परिस्थिती , सामाजिक
स्थित्यरांचा वेध घेणारी व परखड, स्पष्ट
शब्दात केलेले आत्मनिवेदन म्हणून ‘आयदान’
चे वाचन हमखास केले पाहिजे.
@सुरेश पाटील, नाशिक
@सुरेश पाटील, नाशिक
टिप्पण्या