मुसाफिर – एका अवलिया माणसाचा संघर्षपूर्ण प्रवास




अच्युत गोडबाले या अवलिया माणसाचा उत्कंठावर्धक, चित्तथरारक असा संघर्षपूर्ण प्रवास ‘मुसाफिर’ या आत्मचरित्रात शब्दबध्द करण्यात आला आहे. ‘मनोविकास प्रकाशन’ ने प्रकाशित केलेले ‘मुसाफिर’ हे 464 पानाचे पुस्तक आहे. पुस्तकातील एक एक पान जेव्हा आपण वाचण्यास घेतो. तेव्हा 464 पाने केव्हाच वाचून झालेली असतात हे आपले आपणास कळत नाही. ऐवढे हे आत्मचरित्र अप्रतिम झाले आहे. सोलापूर मधील एक हुशार, लाजरा-बुजरा तरूण पुढे जाऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात लिलया वावरतो तेव्हा आपण अचंबित होतो.
            चित्रपट व संगीताचे प्रचंड वेळ…सोलापूरातील प्रत्येक चित्रपटगृहात केलेली भटकंती…संगीत मग त्यात शास्त्रीय संगीताची आवड…लहानपणी लेखकाला कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर या महान कलाकारांचा सहवास लाभला, त्यातून त्यांच्या संगीताच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या. सोलापूरमधील लोकजीवन, संस्कृती, परंपरा लेखकाने आत्मचरित्रात उभ्या केल्या आहेत. सोलापूरमधील मित्रपरिवाराशी असलेले ऋणानुबंध…गल्ली-बोळ…चौका-चौकातील वैशिष्टये… खाद्यसंस्कृती, मंदिरे, किल्ले, जत्रा, लोकजीवनातील बोलीभाषा,शाळा, शिक्षक, साहित्य अभिरूची, संगती मैफिली आत्मचरित्रात लेखकांनी जिवंत केल्या आहेत.
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतांना लेखकाची झालेली जडणघडण, शिक्षकांची व्यक्तीमत्त्वावर पडलेली छाप, विविध विषयांमध्ये निर्माण झालेली गोडी, वाचनाची आवड, विविध लेखकांच्या दर्जेदार साहित्याची केलेली पारायणे, पु.ल.देशपांडे यांच्या साहित्याची आवड, सोलापूरमधील गणपती उत्सव, देवाच्या कल्पनाविषयी लेखकांच्या मनात असलेला स्वसंवाद, देवानंद कॉलेजमधील प्रवेश असे सर्व प्रसंगांमुळे आपण पुस्तकात एकरूप होत जातो. लेखक दहावीत गुणवत्ता यादीत झळकतो म्हणजे लेखकाची बुध्दिमत्ता कुशाग्र आहे. ‘आयआयटी ’ची जेईई परीक्षा उत्तीर्ण होऊन लेखकाचा पवई येथे इंजिनिअरींगसाठी प्रवेश होतो. चुलतभावने मेर्टालॉजिकल इंजिनिअरींग केले असल्यामुळे लेखकही तीच शाखा निवडतो. नंतर मात्र मित्रांशी चर्चा केल्यानंतर लेखक केमिकल ही शाखा निवडतो. ‘आयआयटी’ पवईमधील होस्टेल लाईफ, रॅगिंग चा अनुभव, मुंबई लोकलमधील प्रवासोनुभव, चित्रपट व संगीत अभिरूची असलेल्या मित्रांचा जमलेला ग्रुप, इंग्रजी अभावी आलेला न्यूनगंड, त्यानंतर इंग्रजीवर केलेली मात, आलेला आत्मविश्वास, एकूणच आयआयटीमधील धम्माल किस्से आपणास वाचण्यास भेटतात.
            प्रफुल्ल बिडवई, सुहास परांजपे, कुमार शिराळकर (आतेभाऊ) यांच्याशी असलेली घनिष्ट मैत्री…आयआयटी मधील हेच मित्र पुढे जाऊन शहादा च्या आदिवासी चळवळीत सहकारी असतात. आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखक डाव्या विचाराने प्रभावित होऊन स्वत: शहादाच्या आदिवासी चळवळीत झोकून देतो. शहरातील आदिवासी चळवळीचा इतिहास, भिल्ल समाजातील परंपाची माहितीही लेखकांने पुस्तकात मांडली आहे. खाजा नाईक, तंट्या भिल्ल, गुला महाराज यांच्या कार्याचा परिचय या आत्मचरित्रात लेखक करून देतो. आदिवासी चळवळीतील सहकारी कुमार शिराळकर, वाहरू सोनवणे, अबरसिंग सुरवंती, दिनानाथ मनोहर, प्रकाश सावंत, तुळशी परब, माधव रहाळकर, प्रफुल्ल बिडवई, सुहास परांजपे हे चळवळीतील शिलेदार आपणास पुस्तकात भेटतात. धुळ्यातील तुरूंगात लेखकाने घालविलेले दहा दिवसाचे अनुभव प्रत्ययकारी आहेत.
            चळवळीचे कार्य अपूर्ण सोडून घरी आल्याची खंत लेखकाला आयुष्यभर बोचत असते. मात्र चळवळीनंतर लगेच घरी आल्यावर त्याचा परिणाम जास्त जाणवतो. आत्ममग्न, एकाकी अशा अवस्थेत लेखक प्रचंड अशा व्यसनाच्या आहारी जातो. त्यातल्या त्यात एकुलता एक मुलगा ‘निहार’ च्या ॲटिझन्स या आजारामुळे त्यांच्या भविष्याच्या काळजीने अजून एकाकी पडत जाऊन व्यसनात आकंठ बुडून जातो. मात्र त्यातून लवकरच सावरत लेखक पुन्हा फिनिक्स भरारी घेतो. मुलांच्या उपचारासाठी वेगवेगळया देशांची भ्रमंती, ‘आशियाना’ संस्था स्थापन करण्याची धडपड, संस्थेची सहकाऱ्यांच्या मदतीने भरारी, त्यानंतर संगणकावर साध्या व सोप्या इंग्रजीत प्रकाशित पुस्तके त्याला वाचकांचा मिळालेला प्रतिसाद यातून लेखकात नवी जिद्द, आत्मविश्वास येतो. लेखकाने संगणक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठमोठया पदांवर तब्बल 30 वर्ष मॅनेजिंग डायरेक्टर, चीफ एक्झिक्युटिव्ह, सीईओ, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अशा पदांवर काम करून एक झगमगाटी, पंचतारांकित आयुष्य जगलेले असते. अमाप संपत्ती, ऐषआरामीच्या जीवनातील यशोशिखरावर असतांना अचानक लेखकांला या झगमगाटी आयुष्याला स्वारस्य वाटत नाही. जगावेगळे काहीतरी करण्याच्या ईर्षने आजपर्यंत घेतलेल्या समृध्द अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे. यासाठी अच्युत गोडबोले यांनी विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्याचा झपाटा सुरू केला. विविध भाषांवरील आतापर्यंत तब्बल 29 पुस्तके मराठी भाषेत व 4 इंग्रजी भाषेत लिहली. यात संगणक (संगणकयुग), व्यवस्थापन (बोर्डरूम), संगीत (नादवेध), विज्ञान (किमयागार), अर्थशास्त्र (अर्थात), गुलामगिरी (गुलाम), चंगळवाद (थैमान चंगळवादाचे), नॅनोटेक्नॉलॉजी (नॅनोदय), स्टीव्ह जॉब्जचे चरित्र (स्टीव्ह जॉब्ज), मानसशास्त्र (मनात) अशा अनेक विषयांवरच्या पुस्तकांचा समावेश आहे.
            मुसाफिर आपणास एका समृध्द अनुभव देतो. वाचक म्हणून आपण लेखकाच्या अधिक प्रेमात पडत जातो. प्रत्येकाने मग तो कॉलेजचा  तरूण असो की वयोवृध्द ज्येष्ठ असो अशा प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे. जीवन जगण्याची एक नवी उर्जा आपणास हे पुस्तक देऊन जाते.
                                                  सुरेश पाटील, नाशिक.
           

टिप्पण्या