‘बाप माणूस’ साकारतांना….
‘बाप माणूस’
साकारतांना….
समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक
उपायुक्त सन्माननीय राजेंद्र कलाल साहेब 30 सप्टेंबर 2018 रोजी 32 वर्षाच्या निस्पृह
व समाजाभिमुख शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांच्या प्रशासकीय व
सामाजिक वाटचालीवर प्रकाश टाकणारी पुस्तिका छापण्याची इच्छा श्री.भागवत पाटील साहेब
यांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यानंतर या इच्छेवर अनेकांनी दुजारा दिला आणि ‘बाप माणूस’
स्मरणिकेच्या निर्मितीस सुरूवात झाली. ‘बाप माणूस’ ही 112 पानांची ‘स्मरणिका’ प्रसिध्द
करण्याची प्रक्रिया साधी - सोपी नव्हती. संपूर्ण फोर कलर मध्ये ही ‘स्मरणिका’ प्रसिध्द
करण्याचा मनोदय सेवापूर्ती आयोजन सोहळा समितीचे एक प्रमुख सदस्य श्री.राजेंद्र कांबळे
यांनी माझ्याकडे व्यक्त केला. त्यादृष्टीने आम्ही शहरातील अनेक नावाजलेल्या प्रिंटीग
युनिट, प्रकाशन संस्थांना भेटी दिल्या. पण ‘स्मरणिका’ छापण्याचा खर्च सेवापूर्ती आयोजन
सोहळा समितीच्या आवाक्यात येत नव्हता. त्यामुळे आम्ही निराश, हताश झालो होतो. मात्र
आता एकदा मनात केलेला निश्चयापासून माघार घ्यायची नाही. अशी मनाशी खुणगाठ बांधली. आणि
नव्याने त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरूवात केली. योगायोगाने आम्हास महात्मा गांधी शिक्षण
संस्थेचे श्री.धनंजय धुमाळ हे भेटले. श्री.राजेंद्र कांबळे यांचे त्यांच्याशी बोलणे
झाले. राजेंद्र कलाल साहेबांच्या प्रेमापोटी सदर ‘स्मरणिके’च्या प्रकाशनाची जबाबदारी
त्यांनी घेतली. आणि ‘बाप माणूस’ स्मरणिका साकारण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली.
राजेंद्र कलाल साहेबांचे कार्य
व लोकसंग्रह अफाट असा आहे. 32 वर्षाच्या शासकीय सेवेत त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत.
अशा सर्व माणसांशी संपर्क साधून त्यांचे साहेबांप्रती असलेल्या भावना शब्दबध्द करणे
आवश्यक होते. यात मग काही सेवानिवृत्त अधिकारी होते. कर्मचारी होते. सध्या कार्यरत
असलेले अधिकारी होते. प्राचार्य होते. सामाजिक कार्यकर्ते होते. कुटुंबातील सदस्य होते.
महाविद्यालयीन मित्र होते. बालपणीचे मित्र होते. साहेबांनी पालकत्व स्विकारलेले मुलं
होती. मानस पुत्र होते. शिष्य होते. कार्यालयातील वर्ग 4 कर्मचारी होते. साहेबांचे
पाठीराखे होते. ऐवढेच काय काही टिकाकार पण होते. या सर्वांना लिहिते करणं म्हणजे तारेवरची कसरत होती.
यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. मोजक्याच पण जवळच्या प्रभावी व्यक्तींची यादी तयार
करून घेतली. त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला. दि.20 सप्टेंबर 2018 पर्यंत लेख पाठविण्याची
डेडलाईन घालून दिली. जसजसे लेख येत गेले. त्यांचे संपादन करत गेलो. त्यामुळे काम थोडे
हलकं होत गेलं. ‘स्मरणिके’ साठी अनेक लेख आले. मात्र त्यात सुसूत्रता नव्हती. मांडणी
नव्हती. भावना शुध्द होत्या पण त्या मांडता आल्या नव्हत्या अशा अनेक लेखांचे 10 ते
15 वेळा वाचन करून त्यांना नव्याने माझ्या शैलीत, भाषेत, शब्दात लिहिण्याचं काम केलं.
अनेकांनी आपल्या भावना ध्वनीमुद्रित करून माझ्याकडे पाठविल्या होत्या. त्या मी रात्रीच्या
निवांत वेळी ऐकून माझ्या भाषेत लिहून घेतल्या. ‘स्मरणिके’साठी लेखन केलेल्या लेखकांत
दस्तरखुद्द राजेंद्र कलाल साहेब, साहेबांचे मुलं, सासू-सासरे , सेवानिवृत्त समाज कल्याण
आयुक्त श्री.इ.झेड. खोब्रागडे, सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त श्री.काशिनाथ गवळे,
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूरचे उपायुक्त श्री.प्रशांत चव्हाण, पुणे
आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री.प्रदीप भोगले, श्रीमती पुष्पा कानडे, वर्ध्याचे श्री.प्रविण
कलाल, प्राचार्य श्री. विलास देशमुख, श्रीमती अनिता राहळकर, श्री.नरेंद्र साळुंके-सौकुदे,
पुण्याचे जनसंपर्क अधिकारी श्री.शशिकांत पाटील या सर्वांचे लेख भाषा व व्याकरणदृष्टया
शुध्द होते. यातील काही लेखांमध्ये त्या लेखकांच्या साहित्यिक व्यक्तीमत्त्वाची झलक
दिसून येत होती. यात श्री.राजेंद्र कलाल (‘ब्रह्मगिरी परिक्रमा’ एक अवर्णनीय आनंद देणारा
अनुभव) श्री.इ.झेड.खोब्रागडे (समाजाहितासाठी समर्पित धडाडीचा अधिकारी) श्री.प्रशांत
चव्हाण (वादळ थकत नाही…) श्री.प्रदिप भोगले (साहेब , मला एक शर्ट हवाय !!) श्री.पुष्पा
कानडे (राजुदा..एक अवलिया…!) श्री.प्रविण कलाल (मला लाभलेलं एक ‘परीस स्पर्श’ व्यक्तीमत्त्वं)
व श्री.नरेंद्र साळुंके-सौकुदे (मातीच मार्दव सांगे, कोंभाचे लवलव, मला गवसलेलं ‘परब्रह्म’)
या अप्रतिम लेखांचा उल्लेख करता येईल.
काही लेखकांनी कहरचं केला. आठ
ते दहा पानी निबंधचं त्यांनी लिहून काढला होता. या 8-10 पानांचे 1 पानाच्या व्याकरण,
भाषा शैलीच्या दृष्टीनं शुध्द लेखात रूपांतर करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. या सर्व प्रक्रियेत लेखांच्या संपादना बरोबरच स्मरणिके
साठी फोटो जमविण्यात वेळ गेला. आलेल्या सर्व
लेखांचे पद, दर्जा यानुसार क्रम लावण्यास 1 दिवस गेला. ‘बाप माणूस’ स्मरणिकेत श्री.राजेंद्र
कांबळे, श्री.भागवत पाटील, श्री.मुकेश कानडे यांनी सहसंपादक म्हणून काम पाहिले. तर
श्री.मदन बडे , श्री.धनंजय धुमाळ यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले. सहसंपादक किंवा
उपसंपादक हे फक्त नामधारी असे नव्हते. खरोखर सर्व सहसंपादक व उपसंपादक यांनी अंकाच्या
निर्मितीसाठी मला मनापासून सहकार्य केलं. मदत केली. अंकासाठी लेख जमविणे, लेखकांशी
संपर्क करणे, त्यांचे फोटो प्राप्त करून घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अंकासाठी
मंत्री महोदय, आमदार, सचिव, विभागीय आयुक्त व समाज कल्याण आयुक्त यांचे शुभेच्छा संदेश
प्राप्त करून घेण्याचं काम या लोकांनीच अत्यंत कमी कालावधीत करून दाखविले. त्यांच्या
मदतीशिवाय हा अंक प्रसिध्द होणे शक्यचं झाले नसते. या लोकांनीच मला अंकासाठी मुख्य
संपादक पदाचा दर्जा दिला. माझ्या क्षमतेवर विश्वास दाखविला. त्यामुळे मी त्यांचा सदैव
ऋणी राहिलं.
या
अंकाची निर्मिती मोजून 15 दिवसात झाली. यात पहिले 10 दिवस लेख संकलित करणे, संपादन
यात गेले. त्यानंतरचे 5 दिवस मधुरा प्रिंट सोल्यूशन, अंबड येथे संगणकावर आकर्षक मांडणी
व मुद्रितशोधन यात गेले. यासाठी ऑर्टिस्ट केदा मांडवले यांने ही खूपच मेहनत घेतली.
आपली कल्पकता व ज्ञान वापरून अंकाची त्याने आकर्षक मांडणी केली. मी वेळोवेळी दिलेल्या
सूचनांचे त्याने तंतोतत पालन केले. त्यानंतर हा अंक साकार झाला.
बाप
माणूस स्मरणिकेंच प्रकाशन दिनांक 30 सप्टेंबर 2018 रोजी गंगापूर रोडवरील चोपडा बॅक्केट
हॉल येथे कलाल साहेबांच्या सेवापूर्ती सोहळयाच्या दिवशी आमदार श्रीमती सिमताई हिरे,
ज्येष्ठ निरूपणकार श्री.विवेक घळसासी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगरचे
अध्यक्ष श्री.प्रभाकर वायचळ ,भाजपचे माजी शहराध्यक्ष श्री.लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते
झाले. सेवापूर्ती सत्कार सोहळयास दीड हजार नागरिक उपस्थित होते. पुस्तिका हातात पडल्यावर
अनेकांनी अप्रतिम, दर्जेदार, संग्राह्य, अभ्यासपूर्ण, आठवणीचा पट उलगडणारा दस्तावेज,
साहित्यिक बाज, जाण असलेली स्मरणिका असा शब्दात अभिप्राय दिला. अजून अनेक जणांचे दूरध्वनी
येत आहेत. वॉटस्ॲप च्या माध्यमातून स्मरणिकेची प्रत पाहिजे. असल्याची विचार होत आहे.
एकूणचं चांगल्या प्रतिक्रिया येत आहे. स्मरणिकेला ‘बाप माणूस’ हे दिलेलं शिर्षक ही
समर्पक असल्याचं लोक सांगत आहेत. या शिर्षकामागील कथा ही मोठी आहे. इथं सांगण्यास गेलो
तो लेखातील विषय, आशय लांबत जाईल. त्यामुळे नंतर कधीतरी यावर लिहिण्याचा प्रयत्न करेल.
शेवटी
कोणत्याही व्यक्ती, अधिकारी यांच्या सामाजिक व प्रशासकीय कार्यावर ‘स्मरणिका’ साकारतांना
तो व्यक्ती त्या दर्जेचा, तोडीचा, उंचीचा असावा लागतो. त्याचे कार्य सर्वमान्य असावे
लागतं. समाज-जनमाणसांत तो लोकप्रिय असावा लागतो. त्यांच्या वर प्रेम करणाऱ्या लोकांची
संख्या प्रचंड असावी लागते. खऱ्या अर्थाने तो व्यक्ती बाप माणूस असावा लागतो. वर सर्व
विशेषणे, शब्दप्रयोग कलाल साहेबांच्या प्रती तंतोतत लागू पडतात. त्यामुळेच बाप माणूस
ही स्मरणिका सिध्द होणे सहज व सोपे होत गेले.
शेवटी
जाता-जाता एवढेचं सांगतो की, ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी व राजेंद्र कलाल साहेब
यांनी ‘स्मरणिके’ चं वाचन केल्यावर माझ्या पाठीवर दिलेली थाप ही मला आयुष्यभरासाठी
प्रेरणा व उर्जा देत राहणार आहे.
सुरेश
पाटील
जनसंपर्क अधिकारी, समाज कल्याण
विभाग,नाशिक
टिप्पण्या