फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा !
डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या ‘विनासायास वेटलॉस’ थेअरी चा सर्वसामान्यांना फायदा

फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, अशी अनोखी आहारपध्दती औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढली आहे. ‘विनासायास वजन कमी’ करण्याच्या या आहारपध्दतीचे ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. यासाठी त्यांनी ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ  सुरू केली आहे.  २०० च्या वर व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची ही अनोखी आहार पध्दती ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. 2 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कालिदास नाटयगृहात ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची  ही आहार संशोधन पध्दती काय आहे ?  आणि या आहारपध्दतीचा वापर करून आपले वजन आश्चर्यकारक रित्या कमी केलेल्या नाशिक मधील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण या लेखात जाणून घेणार आहोत…!
डॉ. जगन्नाथ दीक्षित हे सध्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनऔषध वैद्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.  ते गेल्या 27 वर्षोपासून  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करत आहेत. स्वर्गीय श्रीकांत जिचकार यांनी सांगितलेल्या ‘आहार पध्दती’ मधून प्रेरणा घेऊन त्याबाबत स्वतःवर संशोधन करून डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांनी स्वत:ची अशी ‘संशोधन पध्दती’ विकसित केली आहे. सन 2012 मध्ये डॉ.दिक्षित यांचे वजन मोठया प्रमाणात वाढले होते. अनेक आहारपध्दती व महागडे उपाय करून ही त्यांचे वजन कमी होत नव्हते. तेव्हा त्यांना ‘युट्यूब’ या सोशल माध्यमात डॉ.श्रीकांत जिचकार यांचा विनासायास वजन कमी करण्याचा व्हिडिओ पाहण्यात आला. तेथेच त्यांच्यातील संशोधक जागा झाला आणि श्री.जिचकार यांनी सांगितलेल्या पध्दतीप्रमाणे स्वत:वर प्रयोग केला. यामुळे त्यांचे स्वत:चे तीन महिन्यात 8 किलो वजन कमी झाले. पोटाचा घेर ही 2  इंचाने कमी झाला. त्यामुळे डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या या ‘थेअरी’चा त्यांनी चिकित्सक दृष्टीने अनेक दिवस अभ्यास केला. त्याचा स्वत: वर व अनेकांवर प्रयोग केला. त्यामुळे अनेक लोकांचे वजन कमी कालावधीत विनासायास, कोणत्याही प्रकारचे शारिरीक व्यायाम न करता कमी झाले. त्यांनी सुरू केलेल्या या ‘विनासायास वेटलॉस’ अभियानात कालांतराने अनेक लोक जुडले गेले. २०० च्या वर व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ 28000 माणसांपर्यंत पोहोचली आहे. डॉ.श्रीकांत जिचकार यांचा जन्मदिवस दिनांक 2 जून 2018 रोजी या अभियानास ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ असे नांव दिले आहे.
डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची हा ‘विनासायास वेटलॉस’ ची आहार पध्दती काय आहे ? लठ्ठपणाचे सफरचंदासारखा आणि नासपती सारखा असे दोन प्रकार आहेत. यात सफरचंदासारखा लठ्ठपणाचे जास्त दुष्परिणाम आहेत. जास्त खाणे आणि कमी हालचाल करणे हे वजन वाढण्याचे कारण आहे. तसेच रक्तातील वाढलेल्या ‘इन्सुलिनमुळे’ लठ्ठपणा येतो. अधिकच्या ग्लुकोजमुळे चरबी बनते. इन्सुलिनची रक्तातील पातळी वाढल्यास उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी वाढते. हे कमी करण्यासाठी इन्सुलिनची पातळी कमी करणे गरजेचे आहे. त्यावर दिवसातून दोन वेळेस जेवण करणे आणि शक्य तेवढे गोड पदार्थ टाळणे हा सर्वांत मोठा उपाय असून हे आयुर्वेदाने देखील सांगितले आहे. जेवण 55 मिनिटांत संपावे. दोन जेवणाच्या मध्ये जितक्या वेळेस काही खाल, चहा प्याल तेवढे ‘इन्सुलिन’ वाढते. त्यामुळे पाणी आणि ताक पिण्याव्यतिरिक्त दोन जेवण्याच्या मध्ये काही खाण्याचे टाळावे. ‘डायट प्लॅन’ ने अजिबात वजन कमी होत नाही. तब्बल 247 प्रकारचे ‘डायट प्लॅन’ असून त्याने आपण उपाशी राहतो. आपण काय खातो याला महत्व नसून किती खातो याला जास्त महत्त्व आहे. दोनदा भूक लागली की खावे. प्रोटिनचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. मधुमेह असणाऱ्यांनी बिना साखरेचा चहा सेवन करावा. यासाठी कोणताही व्यायाम करण्याची गरज नाही. पैशांची आवश्यकता नाही. दोनदा जेवा, गोड पदार्थ टाळा आणि जेवणात पालेभाज्या जास्त प्रमाणात असाव्यात. त्याचबरोबर लहान मुलांना दिवसांतून चार वेळा जेवण देण्यात यावे. त्यांना कोल्ड्रिंक्स पासून दूर ठेवावे. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट्स नाही. कोणत्याही औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. ‘स्लिम स्वेट बेल्ट’ने देखील वजन कमी होत नाही. 45 मिनिटात साडेचार ते पाच किलोमीटर चालावे आणि दिवसातून दोनवेळेस जेवण्याचा ‘डायट प्लॅन’ प्रामाणिकपणे करा, असेही साधी व सोपी डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची ‘वेटलॉस थेअरी’ आहे.
डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या या ‘वेटलॉस थेअरी’ चा या दैंनदिन जीवनमानात उपयोग करून वजन कमी केलेल्या काही आरोग्यप्रेमींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ .
श्री.ज्ञानेश्वर धामणे (बांधकाम व्यावसायिक) :- डॉ.दिक्षित यांनी सांगितलेल्या ‘वेटलॉस प्लॉन’ प्रमाणे मी मागील 12 महिन्यापासून रोजच्या जीवनात आहार ठेवला. त्यामुळे माझे वजन 85 किलोवरून 70 किलोपर्यंत कमी झाले आहे. माझ्या ‘मधुमेह’ च्या औषधीचा डोस ही पूर्वीपेक्षा 75 टक्क्यांनी कमी झाला आहे. रोज सकाळी 11.00 व संध्याकाळी 8.00 अशा जेवणाच्या मी 2 वेळा ठेवल्या आहेत. तसेच दररोज सकाळी 45 मिनिटे चालणे व दीडतास योगासने  नियमितपणे केल्यास या आहारपध्दती  त्वरित फायदा होतो.




श्री.रमेश मिसाळ (उपजिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी, म्हाडा,नाशिक बोर्ड) :-  दिनांक 25 नोव्हेंबर 2017 पासून मी डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची आहारपध्दती अंगिकारली त्यानंतर 3 महिन्यात माझे वजन 11 किलोने कमी झाले. यामुळे मी दि.8 जुलै 2018 रोजी झालेल्या नाशिक मॅरेथॉन मध्ये 79 मिनिटात 10 किलोमीटर अंतर न थकता धावू शकलो.



श्री.संजय मोरे (सेवानिवृत्त शिक्षक) :- दिनांक 20 डिसेंबर 2016 रोजी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात मी डॉ.जगन्नाथ दिक्षित यांचे व्याख्यान ऐकले. आणि माझ्या जीवनात बदल झाला. सन 2011 मध्ये माझे वजन 120 किलो होते. त्यावेळी मी मुंबई येथे वजन कमी करण्याची महागडी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे वजन अचानक 35 किलोने कमी झाले. मात्र लगेच पुढील 6 महिन्यात वजन वाढले. डिसेंबर 2016 मध्ये माझे वजन 96 किलो होते. डॉ.दिक्षितांनी सांगितलेली आहारपध्दतीचा मी वापर सुरू केल्यावर माझे वजन तीन महिन्यातच 86 किलो झाले. या आहारपध्दतीचा मी मागील 20 महिन्यापासून उपयोग करित आहे.

श्री.रमेश आहेर (लेखापाल, प्रबोधिनी विद्यामंदिर) :- मागील 4 महिन्यापासून मी या आहारपध्दतीचा वापर करित आहे. दुपारी 1.00 वाजता व संध्याकाळी 8.00 वाजता अशा जेवणाच्या 2 वेळा मी ठेवल्या आहेत. सकाळी दररोज 5 किलोमीटर चालणे व 1 तास पोहणे आदी व्यायाम प्रकारावर मी भर दिला आहे. यामुळे माझे वजन मागील 4 महिन्यात 74 किलोवरून 70 किलो एवढे झाले आहे.


श्री.दिनेश सिरसमाने (पोलीस हवालदार, पोलीस आयुक्तालय,नाशिक) :- मी सन 2012 पासून मधुमेह या आजाराने ग्रस्त होते. दिवसभर मला सतत काहीतरी खाण्याची सवय जडली होती. तरीही संध्याकाळी मला भूक नियंत्रणात ठेवता येत नव्हती. हे सर्व लक्षणे ‘मधुमेह’ या आजारामुळेच उद्धभवत होती. डिसेंबर 2016 मध्ये डॉ.दिक्षितांचे नाशिक येथे एका कार्यक्रमात व्याख्यान ऐकले. आणि माझ्या जीवनात परिवर्तन झाले.  ह्या थेअरी प्रमाणे आहार घेण्यापूर्वी माझे वजन 67 किलो होते. साखरेची पातळी 6.8 ऐवढी होती. नंतर मात्र ही थेअरी सुरू केल्यावर माझे वजन 62 किलो झाले. व साखरेची पातळी 6 ऐवढी झाली. यामुळे भूक नियंत्रणात  ठेवणे शक्य झाले. ॲलोपॅथी च्या गोळ्यांना पूर्णपणे रामराम ठोकला.आता माझी जीवनपध्दती अत्यंत सुरळीत व निरोगी अशी चालू आहे.

श्री.विश्वास जोशी (व्यावसायिक) :- डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या थेअरी नुसार मी गेल्या वर्षापासून माझा ‘डॉयट प्लॉन’ ठेवला आहे. माझे एका वर्षापूर्वी वजन 100 किलो होते. आता माझे 85 किलो ऐवढे आहे. मध्यंतरी 4 महिने मी अपघातामुळे बेडवर पडून होतो. त्यामुळे मला ‘डॉयट प्लॉन’ काटेकोरपणे सांभाळता आला नाही. तरीही माझे वजन आश्चर्यकारक रित्या कमी झाले आहे. या ‘डॉयट प्लॉन’ चा सर्वाधिक चांगला फायदा म्हणजे आपली अनेक शारिरीक व्याधींपासून मुक्तता होते. यात ॲसिडिटी, अपचन, मळमळ, डोके दुखी, छातीत जळजळ होणे यासारख्या किरकोळ व्याधींपासून माझी कायमची मुक्तता झाली.

डॉ.सुजित फडके (बालरोगतज्ज्ञ,नाशिक) :- 21 जून 2017 रोजी मी एका वॉटस्ॲप ग्रुपवर वेटलॉस कार्यक्रमाबद्दल ऐकले. त्यानंतर स्वत: डॉ.जगन्नाथ दिक्षित यांना दूरध्वनी द्वारे संवाद साधला. आणि वेटलॉस थेअरी विषयी जाणून घेतले. दिक्षित सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आहार पध्दती अंगीकारली यामुळे माझे वजन 79 किलोवरून 70 किलो ऐवढे झाले. मी जेवणाच्या दोन वेळा ठेवल्या. सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 अशा दोन वेळा मी जेवणासाठी अंगिकारल्या. जेवण फक्त 2 वेळा ठेवले. अत्यंत भरपेट आहार घेतला. ही आहार पध्दती अत्यंत सोपी, खाण्याची कोणतीही बंधने नसलेली अशी आहे. मनाचा निग्रह असल्यावर सदर आहारपध्दती अंगिकारणे सहजशक्य आहे.

श्री.संजय बारसे (ॲकाऊन्ट मॅनेजर) :-  डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ या अभियानात मी दि.23 ऑक्टोंबर 2016 मध्ये सहभागी झालो .तेव्हा माझे वजन 73 किलो होते. व पोटाचा घेर 38 इंच होता. आता सध्या माझे वजन 66 किलो झाले आहे. तर पोटाचा घेर 34 इंच ऐवढा झाला आहे. ही जीवनपध्दतीचा अंगीकार केल्यामुळे माझ्या दैंनदिन कार्यात उत्साह निर्माण झाला आहे.
                                                                                                 
-: लेखन व प्रतिक्रिया संकलन  :-

सुरेश पाटील,

(जनसंपर्क अधिकारी)

प्रादेशिक उपायुक्त कार्यालय,

 समाज कल्याण विभाग, नाशिक


टिप्पण्या