‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा ‘स्व’ च्या आस्तित्वाचा शोध…..!


गूढ, अगम्य अनूभुतीची प्रचिती !

नाशिक समाज कल्याण विभागाचे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवार, दि.19 ऑगस्ट 2018 रोजी ‘ब्रह्मगिरी’ ची लहान व मोठी प्रदक्षिणा पूर्ण केली. यात 24 पुरूष अधिकारी व कर्मचारी मोठया प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. तर उर्वरित सर्व महिला व पुरूष अधिकाऱ्यांनी लहान प्रदक्षिणा पूर्ण केली. ‘ब्रह्मगिरी’ व परिसराला निसर्गाने खरोखर मुक्तहस्ताने दान दिले आहे. ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा म्हणजे ‘स्व’ आस्तित्वाचा शोधच आहे. असे मी म्हणेण ! हा अनुभव इथे मांडण्याचा हा सर्व खटाटोप….

            ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास 7 वषापूर्वीच सुरूवात झाली होती. शासकिय विभागात कार्यरत राहून कायम नवोन्मेषाने विविध संकल्पना राबविणारे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आदरणीय राजेंद्र कलाल सर हे सातत्याने मागील 7 वर्षापासून ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणेचे आयोजन करत आले आहेत. सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लहान प्रदक्षिणेत मी सहभागी झालो होतो. त्यानंतर सन 2016 मध्ये पुन:श्च लहान प्रदक्षिणेत सहभागी झालो.  मरगळलेल्या, ग्लानी आलेल्या सजीव देहांमध्ये पंचप्राण फुंकण्याचे काम यावर्षी केलेल्या 42 किलोमीटरच्या मोठया प्रदक्षिणेने केले आहे. शनिवार, दि.18 ऑगस्ट 2018 रोजी समाज कल्याण विभागाच्या आम्हा सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा लावाजमा गजानन महाराज संस्थानमध्ये दाखल झालो. प्रदक्षिणेचे आयोजन व संयोजनाची सर्व सूत्रे श्री.अनिल तिदमे, श्री.भागवत पाटील, श्री.राजू कांबळे व श्री.मुकेश कानडे यांच्या हातात होती. म्हणायला माझे ही त्यांना थोडेफार सहकार्य होते. गजानन महाराज संस्थानामधील निवास, भोजनांची व्यवस्था अप्रतिम असीच आहे. तिथला परिसर, निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे. संस्थानामधील ज्या ड्रामेंट्री हॉल मध्ये (एकाच वेळेस एका हॉलमध्ये 165 जण झोपतात) आमची निवासाची व्यवस्था केली होती. हॉलमधील सर्व सहकार्याची कलाल सरांनी स्वत: मोजक्या व मार्मिक शब्दात करून दिलेले ओळख अविस्मरणीय अशीच आहे. त्यानंतर रात्री 11 वाजता आम्ही झोपलो. माझ्या जोरात घोरण्यामुळे सहकार्यांना झालेला त्रास यावर स्वतंत्र लेख होईल. याबाबत नंतर बोललेचं बरं राहील.

            खरं म्हटलं तर ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणेला कुशावर्तावरून ब्रह्ममुहूर्तावरून आंघोळ करून प्रारंभ करावा. अशी प्रथा आहे. या प्रथेला जागून आमच्या प्रदक्षिणेचे मॅनेजमेंट गुरू भागवत पाटील व समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अर्धव्यु श्री.राजेंद्र कांबळे यांनी पहाटे चार वाजता कुशावर्त स्नान केले. आम्ही मात्र या आनंदाला, प्रथेला मुकलो होतो. पहाटे 4 ला राजेंद्र कलाल सरांनी प्रदक्षिणेचे 2 ग्रुप तयार केले. मी मोठ्या प्रदक्षिणेच्या ग्रुप मध्ये सहभागी झालो. घनघोर, काळयाकुट्ट अंधारात धुंवाधार कोसळणाऱ्या श्रावणसरी अंग-खांद्यावर खेळवत आमचा प्रदक्षिणेचा प्रवास सुरू झाला. प्रवास कशाला, ‘स्व’ च्या आस्तित्वाचा तो शोध होता….. कोण-कुठला सुरेश पाटील….. आज प्रदक्षिणेच्या मार्गावर झाडे-झुडपे, रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगड-धोंड्यांच्या निर्जीव आस्तित्वात एकरूप झाला होता. पायाखाली न संपणारी डांबरी सडकेची प्रदक्षिणेची वाट…. आणि आमचे ‘बेसूमार’ (आमचे परममित्र मुकेश भाऊंचा शब्द) चालणे… आदल्या रात्री विकत घेतलेल्या कचुकड्याच्या घोंगडीने अंगा-खांद्यावर वार करणाऱ्या पाऊसधारांचे वार स्वत:च्या अंगावर झेलतं आमचं संरक्षण केलं होतं. घोंगडीच्या आत डोकं खुपसून ‘बेसूमार’ चालत मनाच्या काहूरांत कुठेतरी कोसोदूर असलेल्या माझ्या बापाचां, आईचा व माझ्यावर निस्सीम प्रेम, माया असलेल्या आजीचा चेहरा तराळून गेला. सुरेश पाटील (जग्गू) आजपर्यंत यांनीच तर तूला दिले आहे. तू या बदल्यात त्यांच्यासाठी काय केलं आहे ? असे असंख्य प्रश्न काय म्हणून मला या वाटेवर सतावत होते ? हे न उलगडणारे कोडे आहे. म्हणूनचं म्हटलं मी ही नुसती प्रदक्षिणेची वाट नव्हती तर ‘स्व’ च्या आस्तित्वाच्या शोधाची ही वाट होती. चालत-चालतं ‘प्रयागतीर्थ’ तलाव केव्हा आले हे समजलं नाही. ‘प्रयागतीर्था’वर काळ्याकुट्ट अंधारात वाट गळप झाली होती. ही वाट शोधून वळसा घालण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. सर्वत्र चिखल, गवतचं पायाखाली जाणवत होतं. अशा या खरतड मार्गावर अनिल तिदमे, मुकेश कानडे, भागवत पाटील व राजेंद्र कांबळे यांनी वाट शोधण्याचे धारिष्ट दाखविले. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही मोबाईल बॅटरीच्या मिणमिणत्या प्रकाशात ‘प्रयागतीर्था’ला वळसा घातला. त्यानंतर परत सुरू झाला ‘ स्व ’च्या आस्तित्वाचा शोध…

            मुख्य प्रदक्षिणा  मार्गावरील चौकात आम्ही आलो होतो. एक रस्ता ‘ब्रह्मगिरी’च्या प्रदक्षिणा मार्गाकडे जातो. एक रस्ता तुम्हाला थेट नाशिक कडे घेऊन जातो. त्या चौकात मात्र गोंधळ उडाला होता. आमच्या ग्रुपमधील काही महिला मागे राहिल्या होत्या. त्यांत डॉ.रमेश मंत्री दामंप्ते नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यास प्रदक्षिण मार्ग समजून पुढे निघून गेले होते. त्यामुळे कलाल सरांची चिडचिड झाली. या चिडचिड, त्राग्याला मॅनेजमेंट गुरू भागवत पाटील यांनी तिखट फोडणीचा तडका देतं मुकेश भाऊ कानडेंचे नांव मध्येच अलगदपणे घुसडले !  मग कायं सर्व त्रागा, राग मुकेश भाऊ व फेरीत सहभागी झालेल्या एका शारिरीक शिक्षकावर निघाला. त्यानंतर काही कारण नसतांना बिचाऱ्या लक्ष्मीकांत तांबोळी (मेजर) यांच्या नावाचा ही उध्दार झाला. असो !
            ‘प्रयागतीर्था’स वळसा घालून पेगलवाडी मार्गे आम्ही प्रदक्षिणा मार्गावर आगेकूच केली.  ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. श्री.संत निवृत्तीनाथ महाराजांचा याचं ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या मार्गावर योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आहे आणि भागवत धर्माची स्थापना झाली हे आमच्या कलाल सरांनी सांगितलेले वाक्य मनाच्या कप्प्यात कुठेतरी घट्ट कोरली गेली होती. विचारचक्राने इथल्या प्रदक्षिणेचा थेट पंढरपूरच्या वारी शी संबंध जोडला होता. पंढरपूरच्या विठ्ठलपंत व रूक्मिणची म्हणजे संन्याशाची पोरं म्हणून ज्यांना हिणवंल गेले असे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव माऊली, संत सोपान आणि मुक्ताबाई हे चार ही भावंड कधी काळी या ‘ब्रह्मगिरी’च्या याच प्रदक्षिणा मार्गावरून चालली होती. वाटेत चालत असतांना ‘ब्रह्मगिरी’च्या याच जंगलात वाघ आला म्हणून या चारही भावडांची ताटातूट झाली होती. बाकी भावंड एकीकडे आणि संती निवृत्तीनाथ एकीकडे अशी फाटाफूट झाली. घनदाट अरण्यात आपल्या कुटूंबाच शोध घेत असतानाच निवृत्तीनाथ आणि गहिनीनाथांची भेट झाली. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांच्या रूपाने एक गुरू भेटला होता. भागवत धर्मात ज्यांना माऊली म्हणून ओळखले जाते असे संत ज्ञानदेव यांचे गुरू त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ होते तर निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ होते. म्हणजे साक्षात माऊलीच्या गुरूचे गुरू म्हणून गहिनीनाथ यांना ‘महागुरू’ म्हणून संत वाड्मयात स्थान आहे. अशी ही संत परंपरेची पंढरपूरच्या वारीशी असलेले नाळ इथल्या प्रदक्षिणेच्या मार्गातील अंगा-खांद्यांवर, झाड-झुडपांत, कडे-कपाऱ्यात, कोसळणाऱ्या श्रावणधारांच्या सरींमध्ये सामावलेली आहे.

            अशा या भागवत मार्गावर भागवत पाटील व मुकेश भाऊ कानडे यांच्या संवादाची व हजरजबाबी विनोदाची रंगलेली जुगलबंदी रंगत जाते आणि उत्तरोत्तर आम्ही या प्रदक्षिणा मार्गावरील बेसूमार रस्ता तुडवतं…उजळ पडलेल्या पहाटेच्या साक्षीत एव्हाना पहने गाव ओलांडत केव्हा धाडोशी गावाच्या 2 प्रदक्षिणा मार्ग वेगवेगळया होणाऱ्या फाट्यावर येऊन पोहचतो. हे कळतं नाही. फाट्यावर ( चौकात) एव्हाना आमच्यापुढे गेलेले लहान प्रदक्षिणेत सहभागी झालेल्या रणरागिणी काही पुरूषांच्या सोबतीने पोहचलेल्या असतात. मस्त इथेचं नास्त्यावर ताव मारणे चालू झाले असते. नास्त्याचे हे मॅनेजमेंट सर्वस्वी अनिल व भागवत पाटील यांनी केलेले असते.

            या भागवत मार्गावर, या ब्रह्ममार्गावर, या स्वर्गमार्गावर गुरूमाऊलीने प्रवास केला त्याच मार्गावर आम्हाला गुरू माऊली स्थानी असलेले कलाल सर सर्वांची आस्थेवाईकपणे कोणी नास्ता केला याची विचारपूस करत होते. मध्ये अनिल भाऊंनी गरमागरम भज्यांची फर्माईश केली होती. मला साक्षात मुकेश भाऊंनी भज्यांचे भरलेले द्रोण खाण्यास दिले. या आपुलकी, सह्दयपणाच्या भावनेने आम्ही सर्वजण सुखावलो गेलो होतो. त्यानंतर मात्र आम्हा सर्वांच ताटातूट होणार होती. एक मार्ग होता. 20 किलोमीटरच्या प्रदक्षिणेचा…, दुसरा मार्ग होता 42 किलोमीटर च्या प्रदक्षिणेचा…! मी निवडला होता… तो गूढ, अगम्य हरिहर किल्ल्यांचा, शंकराच्या आस्तित्वाचा, महागुरू गहिनीनाथांचा आणि ‘स्व’ आस्तित्व शोधाणारा असा 42 किलोमीटरचा मार्ग….!
            42 किलोमीटरच्या या प्रदक्षिणा मार्गावर चालण्यास तयार झाले होते. एकूण 23 मावळे ! जेव्हा त्यांनी मनाची तयारी केली होती. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांची परिक्रमा पूर्ण झाली होती. सोबतीला होता वाटोळ्या कृष्णा ! महाभारतात रणागंणावर लढणाऱ्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केलं होतं प्रत्यक्ष भगवान श्री.कृष्णानं. आज आम्हाला वाटोळ्या कृष्णा, भगवान कृष्णाचे प्रतिरूपच भासत होता. मोठया प्रदक्षिणा मार्गाच्या रस्त्यावर आम्ही मार्गस्थ झालो होतो. पाण्याने चिंब झालेल्या भाताच्या खेचरांच्या शेतातून आम्ही मार्ग काढत सामुळी गावाच्या पैलतटावरून खडखळत, निसर्गाशी सादर-संगत करत वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या जलाशयातून मार्ग काढत निघालो. खळखळणाऱ्या जलाशयाच्या खाली असलेल्या शेवाळाचा मला अंदाज न आल्यामुळे मी ‘वैतरणा’च्या जलाशयात पडलो, भिजलो, एकरूप झालो, तादम्य पावलो मात्र परत उठलो, मार्गस्थ झालो. जीवनाचं ही असचं आहे. तुम्ही पडता.. परत उठता…. आणि मार्गस्थ होता….!  तो जलाशय आपणास तेच तर सांगून पाहतं होता. पडा, उठा आणि मार्गस्थ व्हावा. प्रवाहीत रहा, जीवनाच साचलेलं डबकं होऊ देऊ नका !

तर कुठे होतो. मी पडलो त्यानंतर मात्र संपूर्ण मार्गावर माझ्या सहकार्यानी माझ्या या एकदाच पडण्यावर मोजता येणार नाही इतक्या शब्दात कोट्या विनोद केले. त्यांच्या या नर्म विनोदी कोट्यांनी मी अनेकदा पडला गेलो होतो. असो, तो चेष्टेचा भाग होता.
            हाताच्या बोटावर मोजता येतील ऐवढ्या सात-आठ खोपटांच्या सामुडी गावाच्या नागमोडी वळणावरून, रस्त्यावरून आम्ही मासळी घाटाच्या पायथ्याशी आलो होतो. त्यानंतर मात्र आमचा निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रवास सुरू झाला होता. तो ‘स्व’ च्या आस्तित्वाचा प्रवास होता. वाटेत 7 डोंगर लागतात. असे कलाल सरांनी सांगितले होते. त्यांतील बहुदा हा एक असावा. संपूर्ण प्रवासात आम्ही एवढे एकरूप, तादम्य पावलो होतो की, वाटेत सात डोंगर लागले की, असंख्य डोंगर होते. याचा थांगपत्ता नव्हता. डावीकडून उजवीकडे नजर जाईल तिथपर्यंत सगळं क्षितीज सह्याद्रीच्या, त्र्यंबकच्या, ब्रह्मगिरीच्या या रागांनी व्यापलेलं होतं. आता इथून पुढे आकाशाखाली फक्त त्याचचं राज्य चालणार होतं. एका बाजूस रस्ता बनवता यावा म्हणून डोंगराचा कोरून काढलेला कणा आणि दुसरीकडे खोल दरी, दरीच्या पुढे परत मोठे डोंगर. डोंगर आणि दर्यांची इथे कमतरता नव्हती. इथल्या पर्वतरागांचे सौंदर्य एखादया सुंदर नारीप्रमाणे नाजूक वाटतं, पण हर्षवाडी डोंगर, हरिहर किल्ला एखाद्या तगड्या मर्दाप्रमाणे दणकट वाटतो. इथल्या डोंगर-दऱ्यांमध्ये जशी दगड-धोंड्याची तशी झाडा-झुडपांचीही बरीच गर्दी. मार्गावर कुठेतरी इथल्या मातीशी इमान राखून पिढ्यानपिढया पासून वास्त्व्य करून असलेले असलेले आदिवासी बांधव भेटायचे. रस्त्यावर चॉकलेटची वाट पाहत असलेल्या लहान मुलांचा घोळकाही भेटायचा. वैतरणाच्या खळखळणाऱ्या जलाशयात आमच्यापैकी काहींनी त्यांच्यासोबत फोटोही काढले ! मध्येच कुठेतरी एखादी छोटीशी नदी किंवा धबधबा रस्त्यांच्या बाजूबाजूने वाट करून डोंगराच्या आत जंगलामध्ये कुठेतरी गुडूप होऊन जाययचा. क्षणभर अस वाटायचं नदीच्या काठा-काठाने आत चालत जावं. आजूबाजूंचे सुष्टी सौंदर्य पाहून आम्हाला आतापर्यंत आलेला थकवा एका क्षणात सगळा कुठल्या कुठे पडाला होता. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, रानवाटा, गडकोट, जलाशय, प्राचीन मंदिरे अशा या विविधतेने हा भाग समृध्द आहे. इथल्या उंच-उंच असलेल्या डोंगररांगांनी एक वेगळाच खेळ मांडला आहे. या खेळात आहेत. आकाशात घुसलेले उंच पर्वत सुळके, कोसळणारे खोल कडे, सर्वोच्च स्थानी विसावलेला तो हरिहर किल्ला (ज्या किल्ल्यांची भुरळ भागवत पाटील यांना पडली आहे. आणि त्यांत आता एक नाव ॲड झाले आहे ते म्हणजे नंदराज पाटील), या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोट्या-छोट्या खोपटांची, राहूटयांनी सजलेली , नटलेली आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्या रहाळावर लक्ष ठेवून मधोमघ विसावलेला तो गूढ , अगम्य ब्रह्मगिरी !

            इथल्या निसर्गाचे वर्णन करावयास गेले तर ग्रंथचे ग्रंथ खरोखर अपूर्ण पडतील असा हा निसर्ग आहे. त्यानंतर आम्ही इथल्या डोंगरदऱ्यांतील पाऊलवाटा मधून वाट काढत कृष्णा च्या सोबतीने डिस्कव्हरी (धिरजचा शब्द) जंगलात शिरकाव करतो. आजबाजूला आपल्या अंगा-खांद्यावर बिलगून असलेल्या फांद्यामधून फक्त एक पाऊलवाट असलेले हे सुमारे 2 किलोमीटरचे जंगल आहे. या जंगलात सर्वांनी हरहर महादेव चा जयघोष केला. आता मात्र या जंगलात मला थकवा जाणवयास लागला होता. मी अंर्तेबाह्य थकलो होतो. मी सहकार्यांचा जोश, उत्साह व इथल्या गूढ शक्ती मला साद घालत होत्या. मला चालण्यास भाग पाडत होत्या. प्रत्यक्ष भगवान शिवशंभू माझ्या सोबत होता जणू ! आमचा अनिल भाऊ मात्र मस्त पैकी ‘डिस्कव्हरी’ जंगलातील आमच्या हाल-अपेष्टांचे चित्रीकरण करत होता. डिस्कव्हरी जंगल संपल्यानंतर आम्ही हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी आला.  हरिहर किल्ला दिसला म्हणजे भागवत पाटील यांच्या अंगात येतं असे कलाल सर यांनी सांगितले होते. आणि खरोखर किल्ल्याच्या पायथ्याला आल्यावर भागवत पाटील यांनी पायथ्याला बैठक मारली …पायथ्याशी असलेल्या चहा बनविणाऱ्या आदिवासी महिलेला सर्वांसाठी कटिंग चहाची ऑर्डर दिली. त्यानंतर त्यांचा मनोरथ सुरू झाला. आता इथपर्यंत आलो आहोत. तर हरिहर किल्ला ची चढाई करूनच घेऊ! पण सपकाळे साहेब व मी त्यांच्या मनइच्छेवर ख्वाडा घातला आणि तो प्लॉन बारगळला. मात्र तोपर्यंत या हरिहरची भूरळ नंदराज पाटील यांना ही पडली होती. त्यांनी पुढील हरिहर चढाई ची तारीख ही त्याठिकाणी घोषित करून टाकली. त्यानंतर आम्ही हरिहर च्या पायथ्याखालील  उतरत्या रस्त्याची वाटेने मार्गस्थ होतं… शिवशंभूचे मंदिर असलेल्या  प्राचीन दगडी पुष्करिणी तलावाजवळ आम्ही येऊन पोहचतो. या तलावात डुबकी मारण्याची मात्र आम्हा सर्वांना भूरळ पडते. सुरूवात सुभाष फड करतात…त्यानंतर भागवत पाटील, मदन बडे, मुकेश कानडे, बिरारी साहेब, मी , पुंडलिक सपकाळे, नांदगांवकर सर, धिरज असे लागोपाठ सर्वजण इथल्या तलावात मस्त पैकी पोहण्याचा आंनद उपभोगतो.

            त्यानंतर मात्र आम्ही निगुरपाडा गाव मार्ग लेकूरवाडी कडे मार्गस्थ होत असतो. त्यावेळी मात्र मला शेवटी थकवा असह्य झालेला असतो….माझे ह्द्य धडधड करावयाचे लागते… जंगलातून ऐवढा प्रवास केला…आतापर्यंत कधी न जाणवलेला थकवा अचानक का जाणवयास लागला…एक एक पाऊल जड झालेले असते…..लागणारा दम असह्य असतो….. तेवढ्यात आमच्या दिमतीला कलाल साहेबांनी दिलेले इन्व्हो गाडी दाखल होते. मी क्षणाचाही विलंब न करता त्या गाडीत जाऊन बसतो. मात्र माझ्या काही सहकार्यांना ते मान्य नसते… मुळात त्यांचा काही दोष नसतोच मुळी मला होणाऱ्या त्रासाची त्यांना सुताराम शक्यता नसते. असह्य दम लागत असतांना……छातीत धडधड होत असतांना.. परत मी धबधब्याकडे जाणाऱ्या टेकडीवरील आडवळणाच्या मार्गावर मार्गस्थ होतो. 

        विचारचक्र सुरू होते. अचानक त्रास का सुरू झाला…अचानक डोक्यात टूब्स पेटली…आज प्रदक्षिणेवर निघतांना घेतो ते आस्थमा इनहेलर चा डोस घेतला नाही……सुदैवाने माझ्या सॅकमध्ये औषधी होत्या… औषधी घेतल्या त्यानंतर सेंकदात नवीन जोश, उत्साह आला. पण प्रवासाला निघतांना इनहेलर चा डोस न घेता निघणारा सुरेश पाटील…ब्रह्मगिरीच्या गूढ, अगम्य… कलाल सर म्हणतात त्याप्रमाणे cosmic energy मध्ये औषध पाण्याविना 8 तास तग धरून होता….नाही म्हटलं तरी मला इथल्या निसर्गाच्या रूपानं, डोंगर-दऱ्यांच्या  सौंदर्यांच्या रूपानं, माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटांमधील दगड-धोंडे , मातीच्या कणांच्या रूपानं शिवशंभो, भगवान, परमेश्वर, ईश्वरांच्या आस्तित्वाचा साक्षात्कार झाला होता. ज्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला त्यांना ‘स्व’ चा ही साक्षात्कार होता.
                                                                                                लेखन :- सुरेश पाटील, नाशिक

टिप्पण्या