मित्रवर्य रावसाहेब पुजारी यांच्या तेजस प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या 'बदलते जग' या दीपावली वार्षिकांकाचा अतिथी संपादक म्हणून यंदाही काम पाहण्याची संधी मिळाली. गतवर्षीप्रमाणे यंदाही तरुणांवर लक्ष केंद्रित करणारा अंक करण्याचे ठरविले आणि विषयही घेतला 'डिजिटल इंडिया, डिजिटल यूथ'! या विशेषांकासाठी लिहीलेली कव्हर स्टोरी खास माझ्या ब्लॉग वाचकांसाठी शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 15 जुलै 2015 रोजी देशाच्या दूरगामी वाटचालीवर प्रभाव टाकू शकेल, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. त्या योजनेचे नाव आहे ' डिजिटल इंडिया '! या योजनेला महत्त्वाकांक्षी व अभिनव म्हणण्याचे कारण असे की, स्वातंत्र्यप्राप्तीपासून केंद्र सरकारने लोकाभिमुख प्रशासनासाठी अनेक कालोचित पावले उचलली. मात्र, तरीही प्रशासन, प्रशासक, धोरणकर्ते आणि भारताचे नागरिक यांच्यामध्ये एक अप्रत्यक्ष दरी निश्चितपणे होती. सुसंवादाचा अभाव, योजना अंमलबजावणीमधील त्रुटी आणि त्यांची पूर्तता तसेच नागरिकांची अपेक्षापूर्ती या सर्वांमध्...